गादीचा अहंकार, गमावलेले शिलेदार आणि एका माणसाचा एकहाती खेळ... पण उद्या काय?
गेल्या दहा-बारा वर्षांत या माणसाने भारतीय राजकारणाचा सगळा पटच असा काही फिरवलाय की भल्याभल्यांची भंबेरी उडली. पण एक त्रयस्थ म्हणून या सगळ्याकडे पाहताना लक्षात येतं की, फक्त या माणसाची ताकद किंवा रणनीती एवढंच या यशाचं गमक नाही. याला तितकेच कारणीभूत आहेत ते समोरचे विरोधक, ज्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची कबर खोदली. कारण? घराणेशाहीची मस्ती आणि नवा नेता उभा करण्यात आलेलं अफाट अपयश. ' आमचीच गादी ' आणि गमावलेले खंदे वीर वर्षानुवर्षे काँग्रेस आणि काही प्रादेशिक पक्षांनी एकाच गोष्टीवर फोकस ठेवला- 'आमचं घराणं, आमचीच गादी'. आजचा तरुण मतदार बदललाय, त्याला भूतकाळातल्या नावांपेक्षा वर्तमानात छाती ठोकून उभा राहणारा नेता हवाय, हे यांच्या गावीही नव्हतं. गादी वाचवण्याच्या नादात त्यांनी या माणसाला टक्कर देऊ शकेल असा एकही नेता कधी घडूच दिला नाही. या ' हायकमांड 'च्या इगोची आणि दरबारी राजकारणाची किंमत त्यांना जबरदस्त मोजावी लागली. जे खऱ्या अर्थाने मातीतून आलेले, झुंजार नेते होते, त्यांना मुद्दाम खड्यासारखं बाजूला काढलं. शरद पवारां सारख्या जाणत्या नेत्याला याच घराण्याच्या अहं...